कोल्हापूर : ‘जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रगतीचा ‘रोड मॅप‘ दर्शविणारा, उच्च शिक्षणाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.
देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच जुलैला त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या सन २०१९-२०च्या अर्थसंकल्पात नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे अंमलात आणण्याचा संकल्प केला आहे. उच्च शिक्षण आयोगाची स्थापना, नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून संशोधनासाठी पायाभूत व भौतिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे; तसेच भारतात शिक्षणासाठी विदेशातून विद्यार्थी यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जगातील टॉप २०० विद्यापीठात भारतीय विद्यापीठ, आयआयटी, आयआयएस यांसारख्या संस्था याव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचा संकल्प करण्यात आला आहे. एकंदरीत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रगतीचा ‘रोड मॅप‘ दर्शविणारा, उच्च शिक्षणाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे,’ असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.